सांगली/ तासगाव : छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियान २०२५ अंतर्गत पाणंद रस्ते खुले करुन ७/१२ उताऱ्यावर व गाव नकाशावर नोंद घेण्याच्या मोहिमेचा शुभारंभ तासगाव तालुक्यातील निमणी येथे करण्यात आला.
रस्त्याच्या नोंदी झालेले सातबारा उतारे संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी शासनाच्या या नाविन्यपूर्ण योजनेची संपूर्ण माहिती दिली. वहीवाटीत असणारे जास्तीत जास्त रस्ते हे गावच्या नकाशावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शासनाचा निधी उपलब्ध होण्यासाठी रस्त्यांच्या नोंदी होणे आवश्यक आहे. हे रस्ते निरंतर शेतकऱ्यांच्याच मालकीचे राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या संमतीने, महसूल विभागाच्या आदेशाने, विविध न्यायालयांच्या निर्णयानुसार ज्या रस्त्यांना मान्यता देण्यात आली आहे ते सर्व रस्ते खुले करण्यासाठी प्रयत्न करावेत. अडथळे, अतिक्रमणे दूर करावीत. असे श्री. दिघे यांनी सांगितले. दरम्यान, निमणी - तुरची रस्ता ते प्रदीप पाटील यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची पाहणी करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे, भारती शुगर्स नागेवाडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील,निमणी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रेखा रविंद्र पाटील, उपसरपंच राजेंद्र घोडके, पोलीस पाटील सतीश पाटील, प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
,रिपोर्ट अतुल काळे
